प्रतिनिधी – गांंधीनगर, 30 ऑक्टोबर : गुजरातमधून मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पूल कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुल तुटला त्यावेळी 400 लोक तेथे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र, यात 60 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पहिला व्हिडीओ आता समोर आला आहे. पूल कोसळल्याने किती लोक नदीत पडले याची माहिती सध्या तरी कळू शकलेली नाही.मात्र, अपघाताच्या वेळी पुलावर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे.
पोलीस आणि प्रशासनासोबतच स्थानिक लोकही बचावकार्यात सहभागी आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता. केबल ब्रिज बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात येत आहे.नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.या अपघातानंतर केबल पुलाचे अनेक फोटो समोर आले असून, त्यात पूल मधूनच तुटून नदीत बुडाल्याचे दिसून येत आहे.
पूल तुटल्यानंतर अनेकजण मधोमध अडकले असून, तुटलेला पूल धरून कसेतरी सुटण्याचा प्रयत्न करत असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.मोरबी येथील अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी बचाव कार्यासाठी तात्काळ पथके तयार करण्यास सांगितले आहे. पीएम मोदींनी परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितले आहे.